सहावी विवेकजागर परिषद : लोकायत विचारमंचचा उपक्रम
वसमत
शहर प्रतिनिधी
– समाजाच्या अंतरंगात शिरून सत्य बाहेर काढणे ही बुद्धिजीवींची भूमिका असते. बुद्धिजीवींनी भूमिका घेणे आणि समाजाला भूमिका घ्यायला लावणे गरजेचे आहे. सध्याचा काळ वेदनेचा असून प्रत्येकाने संवेदना जागृत ठेवून कार्य करण्याची गरज असून नवे जग घडवण्याचा प्रयत्न सुजाण नागरिकांनी करावा,असे प्रतिपादन दत्ता देसाई,पुणे यांनी केले. ते लोकायत विचारमंच आणि स्थानिक संयोजन समिती, वसमत यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या विवेक जागर परिषदेतील सहाव्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर प्रज्वला तट्टे श्री. बी. जी. हेर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक चळवळी आणि बुद्धिजीवींची भूमिका या विषयावर पुढे बोलताना दत्ता देसाई म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्याचा अभ्यास व पुनर्मांडणी करणे महत्त्वाचे आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग यांचे स्वातंत्र्याच्यलढ्यात महत्त्वाचे योगदान आहे. भारतामध्ये चळवळीच्या माध्यमातून खूप काम झाले आहे,परंतु त्याची नीट मांडणी होणे गरजेचे आहे. समाजात भ्रम निर्माण केले जात आहेत, त्याची मुळे शोधून ती उपटून काढणे ही जबाबदारी आपली आहे. आज संवादापेक्षा विसंवादच वाढलेला दिसून येतो त्यामुळे समविचारी प्रवाहांनी एकत्र येण्याची गरज आहे.चळवळीचे नेतृत्व व्यापक व ठामपणे उभे राहते का, याचा शोध बुद्धिजीवींना घेता आला पाहिजे. चळवळींनी गटातटात अडकून न पडता समाजहिताची व्यापक भूमिका घेण्याची गरज आहे. माणसांनी व्यवहारवादाच्या आहारी न जाता समाजाशी आपुलकीचे नाते जोडून आपल्या व्यक्तिमत्त्वातील व चळवळीतील रुक्षता घालवून दिली पाहिजे. माणूस हा एकसंघ नसावा तर तो सुटा असावा,अशी भांडवलशाहीची भूमिका असते.त्यामुळे त्यांच्यावर सहजपणे सत्ता गाजवता येते.आपण वास्तव स्वप्न दाखवून भविष्याचे विश्लेषण केले पाहिजे. खोटी स्वप्न दाखवणाऱ्याचा चेहरा उघडा करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या सत्रातील दुसऱ्या प्रमुख वक्त्या प्रज्ज्वला तट्टे यांनी शेती, शेतकरी आणि आंदोलने या विषयावर आपले विचार मांडले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, शेती ही नैसर्गिक साधनसंपत्ती असून स्त्रिया या शेती चांगल्या प्रकारे करतात. त्यामुळे स्त्रियांनी शेतीचे व्यवस्थापन केले पाहिजे. छोटे छोटे शेतीयंत्र स्त्रियांच्या नावावर दिले पाहिजेत.स्त्रियांच्या श्रमाचे मूल्य वाढवून स्त्रियांना जास्तीत जास्त संधी देणे गरजेचे आहे.
सर्व सत्राच्या शेवटी खुली चर्चा घेण्यात आली. या खुल्या चर्चेत चर्चक म्हणून डॉ.मारोती तेगमपुरे, डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी सहभाग घेतला. यावेळी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना वक्त्यांनी अत्यंत सविस्तरपणे उत्तरे दिली.
या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी तर आभार डॉ. बाळासाहेब भिंगोले यांनी मानले. यावेळी अध्यक्ष,अखिल भारतीय सहकारी साखर संघ श्री. जयप्रकाश दांडेगावकर, के.हरदास, डॉ. अनंत राऊत, श्री. अरुण साधू,श्री. शंकरराव कदम, डॉ.आदिनाथ इंगोले, श्री. विजयकुमार बेंबडे,डॉ. मारोती कोल्हे, श्री. केशव सारंग, सुप्रिया गायकवाड, कमल चव्हाण, एडवोकेट राजा कदम, प्रेमानंद शिंदे आदींसह विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी आणि श्रोते यांची उपस्थिती होती.