वसमत येथे सहावी विवेक जागर परिषद
वसमत
शहर प्रतिनिधी
लोकायत विचारमंचाच्या वतीने दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक व शेतीविषयक प्रश्नांमुळे होरपळून निघणाऱ्या सामान्य माणसांच्या कळीच्या प्रश्नांवर प्रज्ञावंतांकडून विवेकाचा जागर केला जातो .यावर्षी लोकायत विचार मंचाच्या वतीने वसमत जिल्हा हिंगोली येथे दिनांक 9 व 10 एप्रिल 2022 रोजी संपन्न होत असलेल्या सहाव्या विवेकजागर परिषदेत ‘समकालीन भारत: विकास आणि विषमता’ या विषयावर शेती, शिक्षण ,अर्थकारण ,
स्त्रीमुक्ती आणि प्रसारमाध्यमांच्या विषयानुषंगाने विवेकाचा जागर होणार आहे .
‘मूलतत्त्ववाद आणि सांस्कृतिक संघर्ष’ या विषयावर पहिली विवेकजागर परिषद नांदेड येथे संपन्न झाली. ‘ समकालीन शिक्षण :संधी, गुणवत्ता व समानता’ या विषयावर दुसऱ्या परिषदेमध्ये मूलभूत चर्चा करण्यात आली. तसेच ‘जागतिकीकरण :भारतीय शेती व जातीव्यवस्था’ या महत्त्वाच्या विषयावर तज्ञांनी तिसऱ्या परिषदेत विवेकाचा जागर केला. ‘ लोकशाही पुढील आव्हाने व भारतीय संविधान’ या विषयावर चौथ्या विवेकजागर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . ‘समकालीन भारतीय समाज आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावर पाचव्या परिषदेमध्ये विचारमंथन करण्यात आले.
तर एप्रिल महिन्यात वसमत जि. हिंगोली येथे संपन्न होणाऱ्या सहाव्या विवेकजागर परिषदेमध्ये ‘समकालीन भारत: विकास आणि विषमता’ या महत्त्वाच्या विषयावर चर्चा ,चिंतन आणि प्रज्ञावंतांचे विचारमंथन होणार आहे.
एकूण सहा सत्रांमध्ये संपन्न होत होणार असलेल्या या दोन दिवसीय परिषदेमध्ये मा. सुखदेव थोरात (दिल्ली) यांचे ‘शिक्षण आणि समकालीन सामाजिक प्रश्न’ या विषयावर तर डॉ. डी. एन. मोरे (नांदेड) यांचे ‘आजचे शिक्षण वास्तव आणि शिक्षण धोरण ‘या विषयावर विचारमंथन होणार आहे. मा. अजित अभ्यंकर(पुणे) यांचे ‘अब की बार रोजगार’ आणि मा.बी.युवराज (पुणे) हे ‘आर्थिक विषमता आणि बेरोजगारी’ या विषयावर मूलभूत चिंतन मांडणार आहेत. तसेच मा.अनिल सदगोपाल (भोपाळ ) हे ‘ स्वातंत्र्योत्तर भारतातील शिक्षण व्यवस्थेची वाटचाल व दिशा’या विषयावर विचार मांडणार आहेत. मा. प्रज्वला तट्टे (नागपूर) यांचे ‘शेती ,शेतकरी आणि आंदोलने’ या विषयावर तर डॉ.श्रीनिवास खांदेवाले(नागपूर) यांचे ‘भारतीय शेती वास्तव व कृषी धोरणे’ या विषयाच्या अनुषंगाने विचारमंथन होणार आहे. मा. असीम सरोदे (पुणे ) यांचे ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आणि लोकशाही मूल्ये’ या विषयावर तर मा.अमेय तिरोडकर (पुणे) हे ‘आजचे समाजवास्तव आणि प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर आपले चिंतन मांडणार आहेत.मा. दत्ता देसाई (पुणे) यांचे ‘सामाजिक चळवळी आणि बुद्धिजीवींची भूमिका’ या विषयावर तर मा.निर्मला जाधव (औरंगाबाद) यांचे ‘स्त्रीमुक्ती: आजचे संदर्भ’ या विषयानुषंगाने विचारमंथन होणार आहे. वरील महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने प्रज्ञावान विचारवंत आपले चिंतन मांडणार आहेत. तरी चळवळीला बळ देण्याकरता आपण सर्वांनी या परिषदेत सहभागी होऊन ऊर्जा द्यावी, असे आवाहन स्थानिक संयोजन समितीचे माजी आमदार श्री पंडितराव देशमुख, ऍड. रामचंद्र बागल, प्रा .डॉ.नामदेव दळवी, मा.शंकरराव कदम,मा. सुभाषराव भोपाळे ,डॉ.बाळासाहेब भिंगोले तसेच लोकायत विचारमंचचे मा.मा. जाधव, कमलाकर चव्हाण, सूर्यप्रकाश जाधव, अहमद शेख ,शारदा कदम, नवनाथ गोरे ,सुखदेव उंदरे ,विजयकुमार बेंबडे, बालासाहेब काळे आदींनी केले आहे.